अहिल्यानगर | प्रतिनिधी
सीनियर जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया (SJFOI) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची घोषणा अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. फेडरेशनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश शिंदे (जालना), तर सरचिटणीसपदी संजय जोशी (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय सचिव डॉ. जयपाल पाटील यांनी केली.
यावेळी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून ॲड. गोपाळ शेळके, खजिनदार म्हणून डॉ. जयपाल पाटील, तर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. ओंकार माने आणि ॲड. सुनील रावडे यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.
बैठकीत डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष संदीप दीक्षित आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र निरीक्षक सौ. सुहासिनी प्रभूगावकर यांच्या मान्यतेनंतर ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. तसेच फेडरेशनची कायदेशीर नोंदणी पुणे येथील सहकार निबंधक कार्यालयात दाखल करण्यात आली असून जुलै महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
याशिवाय, फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष ओमप्रकाश शिंदे यांना पत्रकारिता क्षेत्रातील सुमारे ३५ वर्षांचा, तर सरचिटणीस संजय जोशी यांना पत्रकारिता, जनसंपर्क, वृत्तपत्र व्यवस्थापन, जाहिरात आणि वितरण क्षेत्रातील ३३ वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. या अनुभवाच्या बळावर राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
यावेळी विभागनिहाय पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र विभागाध्यक्षपदी भगवानराव परळीकर, कोकण विभागाध्यक्षपदी राजा मकोटे, उत्तर महाराष्ट्र विभागाध्यक्षपदी यादवराव पावशे, मराठवाडा विभागाध्यक्षपदी मकरंद जहागीरदार, रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रदीप पाटील (उरण), रायगड सरचिटणीसपदी श्रीकांत सहस्रबुद्धे (महाड) आणि उपाध्यक्षपदी सौ. भारती शहा (खोपोली) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
बैठकीदरम्यान वाहतूक सुरक्षेबाबतही जनजागृती करण्यात आली. वाहनचालकांनी परवाना नसलेल्या व्यक्तींच्या हाती दुचाकी किंवा चारचाकी वाहने देऊ नयेत, अन्यथा अपघात झाल्यास वाहनमालकावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, आयेशा शेख मुलानी, बालाजी अडियल, अभयकुमार यादव आणि सौ. भारती शहा यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


