अंबरनाथ | प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.
वाढवा टॉवर, साईराम नगर, वाढवा चाळ आणि कमलाकर नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले. स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेवर नालेसफाई वेळेत आणि प्रभावीपणे न केल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, अंबर रेसिडेन्सी सोसायटीतही पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा झाला. सोसायटीच्या पार्किंग परिसरात तसेच लिफ्टमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सोसायटीलगतच्या चाळीतील अनेक घरांमध्येही पाणी घुसल्याने कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागला.
नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाने तातडीने पाणी उपसा, निचरा व्यवस्था आणि नालेसफाईची प्रभावी उपाययोजना करावी, तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.



