केज (प्रतिनिधी) :
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होत असून, या निवडणुकीत आता थेट लढत रंगणार आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या विरोधात स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख मैदानात उतरले आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पाच उमेदवारांपैकी तिघांनी माघार घेतल्याने निवडणूक आता द्विपक्षीय झाली आहे. त्यामुळे गावात निवडणुकीची चुरस वाढली असून राजकीय वातावरण तापले आहे.
उमेदवारीवरून आरोप-प्रत्यारोप
स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांच्या उमेदवारीबाबत गंभीर आरोप करत, त्यांच्यावर कुटुंबातील काही व्यक्तींकडून दबाव टाकण्यात आल्याचा दावा केला आहे. विशेषतः त्यांच्या दिराने त्यांना निवडणुकीसाठी पुढे केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यामुळे निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला आहे.
तसेच, “काही लोकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे मला सरपंच होऊ दिले जात नाही, म्हणून अश्विनी देशमुख यांना पुढे करण्यात आले,” असा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला आहे.
आरोप करणाऱ्यांना खुले आव्हान
स्वरूपानंद देशमुख यांनी स्वतःवर झालेले आरोप फेटाळत, “माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी समोर येऊन पुरावे द्यावेत. जर मी कोणाच्या सांगण्यावरून निवडणूक लढवत असल्याचे सिद्ध झाले, तर मी गावासमोर नाक घासून माफी मागून पाठिंबा देईन,” असे खुले आव्हान दिले आहे.
विकासाचे आश्वासन
यापूर्वी गावकऱ्यांनी साडेतीन वर्षे काम करण्याची संधी दिली होती, असे सांगत स्वरूपानंद देशमुख यांनी उर्वरित १८ महिन्यांत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली वाहण्याचा निर्धार व्यक्त केला. गावकऱ्यांनी साथ दिल्यास त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, निकाल काय लागतो याबाबत उत्सुकता वाढली आहे.







