दौंड (प्रतिनिधी) :
दौंड तालुक्यातील वाळकी येथे दिव्यांगांना उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब उघडकीस आली. तलाठी कार्यालयाकडून ५० हजार रुपयांखालील उत्पन्नाचा दाखला देण्यास नकार दिला जात होता. कुटुंबातील सदस्यसंख्या अधिक असल्याचे कारण पुढे करत हा दाखला नाकारण्यात येत असल्याने अनेक दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत होते.
दिव्यांगांचा संताप; तलाठी कार्यालयात जाब विचारणा
या पार्श्वभूमीवर वाळकी गावातील दिव्यांग बांधव एकत्र येत तलाठी कार्यालयात गेले. सोपान हनुमंत थोरात आणि अशोक ज्ञानोबा थोरात यांना उत्पन्नाचा दाखला नाकारल्याबद्दल तलाठ्यांना जाब विचारण्यात आला. मात्र शासन निर्णयाचा आधार देत प्रशासनाने भूमिका कायम ठेवली.
प्रहार संघटनेचे आंदोलन
प्रकरण चिघळल्यानंतर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संस्थेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. दिव्यांगांनी आपला आक्रोश व्यक्त करत तलाठी कार्यालय बंद करून निषेध नोंदवला. “वारंवार हेलपाटे मारूनही दाखला मिळत नसेल, तर अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा देण्यात आला.
संघटनेचा पाठिंबा
स्थानिक अध्यक्ष सोमनाथ लवांडे यांनी संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव तसेच पुणे जिल्हाध्यक्ष शरद जाधव यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यावेळी “दिव्यांगांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, पूर्ण ताकदीने लढा,” असा ठाम पाठिंबा संघटनेकडून देण्यात आला.
तहसीलदारांचा तात्काळ हस्तक्षेप
सदर प्रकरण तहसीलदार अरुण शेलार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. लाभार्थ्यांकडे अल्प जमीन क्षेत्र असल्यामुळे दाखला नाकारला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर तहसीलदारांनी तात्काळ हस्तक्षेप करत तलाठ्यांना लेखी अर्ज स्वीकारून संबंधित दिव्यांगांना त्वरित उत्पन्नाचे दाखले देण्याचे आदेश दिले.
दिव्यांगांना दिलासा
तहसीलदारांच्या आदेशानंतर संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ उत्पन्नाचे दाखले वितरित करण्यात आले. या वेळी तलाठी मोतीबोने, पोलीस पाटील निळकंठ थोरात, पत्रकार विठ्ठलदादा थोरात, माजी सोसायटी चेअरमन गणेश थोरात तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेमुळे प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप केल्यास नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.









