जळकोट (प्रतिनिधी) :
जळकोट तालुक्यात रात्री झालेल्या अवकाळी पावसासह जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उभी पिके जमीनदोस्त झाली असून फळबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.
फळबागांना मोठा फटका
वादळी वाऱ्यामुळे आंबा, चिकू आणि चिंच या फळबागांतील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून हंगामावर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे.
पिकांचेही नुकसान
ज्वारी व गहू ही पिके पावसामुळे भिजल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. यामुळे बाजारभाव घसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
नुकसान भरपाईची मागणी
परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडला असून प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








