गंगाखेड | प्रतिनिधी
गंगाखेड तालुक्यातील खळी, पुनर्वसन खळी, खळी तांडा तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये सतत होत असलेल्या लोडशेडिंगमुळे शेतकरी व नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवरही परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या समस्येची गंभीर दखल घेत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पुढाकाराने महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत वीजपुरवठा नियमित ठेवणे, अनावश्यक लोडशेडिंग टाळणे तसेच खळी, खळी तांडा आणि पुनर्वसन खळी येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पुढील आठवड्यापासून वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत नागरिकांना नियमित व सुरळीत सेवा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
वीज व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.









