कणकवली | प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायतीकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांवर समान कारवाई करावी, मात्र केवळ नरडवे रोडवरील गरीब स्टॉलधारक आणि दुकानदारांवर अन्याय होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटलपर्यंतच्या परिसरातील स्टॉल व दुकाने हटविण्याबाबत सोमवारी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतर वैभव नाईक यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेत याबाबत जाब विचारला.
यावेळी नरडवे रोडवरील दुकानदार व स्टॉलधारकही उपस्थित होते. त्यांनी आपली दुकाने व स्टॉल रस्त्यावर नसून फुटपाथच्या बाहेरील जागेत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या व्यवसायामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याचा दावा त्यांनी केला.
“केवळ नरडवे रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची घाई का केली जात आहे?” असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला. तसेच शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना लेखी नोटिसा देऊन योग्य मुदत देण्यात यावी आणि त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील दिवसापासून कणकवली बाजारपेठेतील अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मात्र, “अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवावीत. कोणावरही निवडक कारवाई होऊ नये,” असे ठाम मत वैभव नाईक यांनी यावेळी व्यक्त केले.
या भेटीदरम्यान नगरपंचायत प्रशासन, स्टॉलधारक आणि स्थानिक नागरिकांमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत चर्चा झाली असून, नगरपंचायतीच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








