आजरा | प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आई-वडील आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे आजरा तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- दीपक दत्तात्रय चांदे (वय ३५)
- शोभा दीपक चांदे (वय ३०)
- जय दीपक चांदे (वय ९)
- पूर्वा दीपक चांदे (वय ७)
मिळालेल्या माहितीनुसार, चांदे कुटुंब मूळचे माद्याळ (दुंडगे) येथील रहिवासी असून ते रोजगारानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होते. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त ते गावी आले होते. गुरुवारी होन्याळी येथे नातेवाईकांना भेटून ते दुचाकीवरून (एमएच ०९ ईवाय ९७८३) माद्याळकडे परतत होते.

सायंकाळच्या सुमारास बहिरेवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचावासाठी दीपक चांदे यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली असताना आजऱ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने (एमएच १२ वायक्यू १४६५) दुचाकीला जोरदार धडक दिली. पाऊस आणि वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुचाकीवर चढला.
अपघात इतका भीषण होता की चौघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, अपघाताची तीव्रता मोठी असल्याने कोणालाही वाचविणे शक्य झाले नाही.
घटनेनंतर आयशर चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
मुंबईहून सुट्टीसाठी आनंदाने गावी आलेल्या संपूर्ण कुटुंबाचा एका क्षणात झालेला अंत गावकऱ्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला असून माद्याळ, बहिरेवाडी आणि आजरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे










