
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथील जाळीवस्ती परिसरात बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका शेतात कुत्र्याचे मुंडके व दोन पाय अर्धवट अवस्थेत आढळून आल्याने वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून हा प्रकार बिबट्याचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदवला आहे. यानंतर परिसरात तातडीने पिंजरा लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक शेतकरी अर्जुन ढोले, बाळासाहेब साळवे, किसन साळवे आणि दादा ढोले यांनी ही बाब प्रतिनिधी श्रीरंग साळवे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वनकर्मचाऱ्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. हे ठसे काही अंतरापर्यंत स्पष्टपणे दिसत होते. तसेच कुत्र्याच्या मृतदेहावरील जखमा आणि शरीराचा फडशा पाडण्याची पद्धत पाहता हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची आवश्यकता असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी भगत मॅडम यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना त्वरित पिंजरा उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, बिबट्याचा वावर लक्षात घेता नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात किंवा एकांत ठिकाणी जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे चांभुर्डीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
