-प्राचार्य श्री डी. एन. जाधव
दोंडाईचा(प्रतिनिधी)-
“शिक्षकांनी केवळ संकल्पना समजून देण्यापेक्षा तो आशय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात जगता यावा,अशी शैक्षणिक परिस्थिती निर्माण करावी. शिकणे ही वेगळी बाब आहे आणि समजून देणे ही वेगळी गोष्ट आहे. घटना एकच असते, परंतु दृष्टिकोनात बदल केला, तर विचार बदलतो त्यामुळे आपले वर्तनही बदलते. म्हणजेच आपला दृष्टीकोन आपले जगणे निश्चित करत असतो” असे प्रतिपादन माजी प्राचार्य व स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे सहसचिव, श्री डी.एन.जाधव यांनी उपस्थित शिक्षक-पालक सहविचार सभेत केले. श्रीमंत राजे दौलतसिंहजी राहुल बी.एड. महाविद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सर्वप्रथम प्रा.आर.पी. पाटील यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. उमा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रा.पी.डी.बोरसे यांनी उद्बोधन केले. त्यांनी सांगितले की, “बी.एड.प्रशिक्षण हा प्रात्यक्षिकांवर आधारलेला अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची घरातील कामे कमी करावी, त्यांच्या उपस्थितीकडे लक्ष द्यावे” पालक श्री अनिल गिरासे यांनी काही मौलिक सूचना केल्या. प्रमुख वक्ते माजी प्राचार्य डी.एन.जाधव यांनी शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून सांगितले की, “आदर्श व परिपूर्ण शिक्षक घडवण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना सहकार्य करावे. गुणवत्तापूर्ण शिक्षक तयार होण्यासाठी महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सहभागी होणे, विद्यार्थ्यांना आवश्यक आहे” प्रा एस.एम. ठाकरे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. रेवती बागुल यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्रा. पी.डी. बोरसे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.आर.पी. यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अमृता चव्हाण,प्रा.डॉ. योगिता चौधरी,प्रा. पी. एल. खाचणे, प्रा. बी. टी. शेजाळ, प्रा. मंजुषा बावने व प्रा. निशा ठाकूर यांनी प्रयत्न केले. तर शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत, जयेश धनगर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.









