बीड | प्रतिनिधी
बीड येथील आदित्य फार्मसी कॉलेज संदर्भात विद्यार्थी आणि पालकांकडून गंभीर आरोप करण्यात येत असून, महाविद्यालयाच्या कथित मनमानी कारभारामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रे परत न देणे आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांना एका विभागात प्रवेश देण्याचे सांगून नंतर अन्य विभागात प्रवेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज केल्यानंतरही महाविद्यालय प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, नियमानुसार दोन वेळा प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज सादर करूनही महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासनाकडे निवेदने देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवून ठेवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक व आर्थिक नुकसान भरून द्यावे, अशी मागणी संबंधित विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रश्नावर शिक्षण विभागाने लक्ष न दिल्यास येत्या २२ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
टीप : वरील सर्व आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केले असून, याबाबत महाविद्यालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. संबंधित संस्थेचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होऊ शकेल.
