नाशिक | प्रतिनिधी
नाशिक विधान परिषद निवडणुकीतील भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, माघारीची घोषणा करताना घडलेल्या एका नाट्यमय प्रसंगामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या शेजारी बसून आयोजित पत्रकार परिषदेत गोकुळ गीते यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, पत्रकारांनी “आपण निवडणुकीतून माघार घेतली आहे, पण नरेंद्र दराडे यांना अधिकृत पाठिंबा देणार आहात का?” असा थेट प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. उलट ते तात्काळ उठून पत्रकार परिषदेतून निघून गेल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना गोकुळ गीते यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ही जागा भाजपकडून गणेश गीते यांना मिळेल, असा शब्द देण्यात आला होता. मात्र, जागा शिंदे गटाकडे गेल्याने वातावरण बिघडले आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.
ते म्हणाले की, १ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना वारंवार माघार घेण्याबाबत फोन आले. तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.
गोकुळ गीते यांनी पुढे सांगितले की, गिरीश महाजन यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून भविष्यात योग्य संधी मिळाल्यास आपला विचार केला जाईल, असा शब्द वरिष्ठांकडून देण्यात आला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, नरेंद्र दराडे यांना स्पष्ट पाठिंबा देण्याबाबत त्यांनी मौन बाळगल्याने महायुतीतील मतभेद पूर्णपणे मिटले आहेत का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. गोकुळ गीते यांच्या या भूमिकेमुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणात आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.
