पनवेल | कळंबोली | प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खारघर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती माता आणि लहान बालकांची काळजी घेणाऱ्या महिलांवर याचा गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
या पार्श्वभूमीवर स्त्री शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या संस्थापिका अध्यक्षा विजया कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तासन्तास होणाऱ्या वीजखंडितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका गर्भवती महिला, प्रसूतीनंतरच्या माता, ज्येष्ठ महिला, आजारी महिला तसेच लहान बालकांची काळजी घेणाऱ्या मातांना बसत आहे.
महिलांवर घर, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असताना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी मानसिक ताण, चिडचिड, झोपेचा अभाव, डोकेदुखी, थकवा आणि इतर आरोग्यविषयक समस्या वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार दिला असून, वारंवार होणारी वीजखंडिती हा महिलांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित गंभीर विषय असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
महिला आयोगाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- पनवेल परिसरातील वीजपुरवठा खंडितीची विशेष चौकशी करण्यात यावी.
- संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात यावेत.
- वीज वितरण यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.
- निष्काळजी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
- गर्भवती, ज्येष्ठ आणि गंभीर आजार असलेल्या महिलांसाठी विशेष संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात.
याप्रकरणी महिला आयोगाने गांभीर्याने दखल घेऊन महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

