ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील व साहित्यिक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना पहिला पुरस्कार जाहीर
अंबाजोगाई | प्रतिनिधी
थोर समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या कार्याला आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या साधनाताई आमटे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी साधना सेवाभावी संस्थेच्या वतीने “साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार” सुरू करण्यात आला आहे. साधनाताई आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (१९२६–२०२६) या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असून, यंदाचा पहिला पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील या दांपत्याला जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार गुरुवार, दिनांक ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आनंदवन, वरोरा (जि. चंद्रपूर) येथील स्वरानंदवन हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भवरलालजी जैन उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे हे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी व गझलकार दिलीप पांढरपट्टे, साहित्य समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, आनंदवनचे डॉ. विकास आमटे व डॉ. भारती आमटे तसेच लोक बिरादरी प्रकल्प, भामरागडचे पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थित राहणार आहेत.
संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शुभदा राठी-लोहिया आणि सचिव दगडू लोमटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
बाबा आमटे आणि साधनाताई यांनी कुष्ठरोगी, अंध, अपंग, मूकबधिर तसेच आदिवासी बांधवांसाठी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पुनर्वसन आणि रोजगाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. स्वाभिमानाने आणि सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क समाजातील वंचित घटकांना मिळावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. साहित्य, कला, संगीत आणि ललितकला क्षेत्रातील व्यक्तींनीही बाबा आमटे यांच्या कार्यात मोलाचे योगदान दिले असून, त्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुष्पहार आणि एक लाख रुपये असे आहे. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय लेखन आणि साहित्य प्रचार-प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अनुराधा पाटील आणि प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील या दांपत्याची पहिल्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अंबाजोगाईसारख्या गाववजा शहरातून अशा स्वरूपाचा राज्यस्तरीय पुरस्कार सुरू केल्याबद्दल साहित्य, कला, संगीत आणि ललितकला क्षेत्रातील मान्यवरांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
