काळकुप | प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळकुप येथील विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली शाळेची जुनी इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने शासनाने तिचे निर्लेखन केले असून त्या इमारतीत वर्ग भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. इमारतीला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने इमारत कोसळण्याची भीती अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील दुसऱ्या ठिकाणी नवीन शाळा इमारत व वर्गखोल्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. मात्र त्या परिसरातून महावितरणच्या उच्चदाब वीजवाहिन्या, वीज खांब, डीपी आणि मुख्य विद्युत वाहिन्या जात असल्याने तेथे शाळा सुरू करता येत नाही. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याने नवीन इमारत तयार असूनही ती वापराविना पडून आहे.
या समस्येबाबत ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने महावितरण, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विभागांकडे वेळोवेळी निवेदने देऊन अनेकदा पाठपुरावा केला. मात्र अद्यापही वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर दि. ७ जुलै रोजी काळकुप येथील हनुमान मंदिर सभामंडपात शाळेचे वर्ग भरविण्यात येणार आहेत. तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महावितरण विभागीय कार्यालय, अहिल्यानगर येथे विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रतीकात्मक स्वरूपात शाळाच भरविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नवीन शाळा इमारतीतील वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या वीजवाहिन्या, डीपी व वीज खांब त्वरित स्थलांतरित करण्यात यावेत, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



