साकुरी (ता. राहाता) | प्रतिनिधी
राहाता तालुक्यातील साकुरी येथे एका वीज रोहित्रावर (डीपी) मोठ्या प्रमाणात वेली व झाडाझुडपे वाढल्याने परिसरात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोहित्र पूर्णपणे वेलींच्या विळख्यात अडकल्याने संभाव्य अपघाताची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वेली थेट विद्युत तारा आणि रोहित्राच्या संरचनेपर्यंत पोहोचल्या असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शॉर्टसर्किट, ठिणग्या उडणे किंवा आग लागण्याचा धोका वाढला आहे. तसेच ओलाव्यामुळे विद्युत प्रवाह रोहित्राच्या लोखंडी संरचनेत उतरण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या रोहित्राजवळून शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांची नियमित ये-जा होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, रोहित्रावरील वेली व झाडाझुडपे तात्काळ हटवावीत, आवश्यक दुरुस्ती करावी आणि परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येसह या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.



