बांबवडे | प्रतिनिधी :
कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी आंबा घाटात नवीन भुयारी मार्ग (टनल) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत माहिती दिली.

आंबा घाटातील वाहतूक कोंडीला दिलासा
सध्या आंबा घाटातील डोंगराळ आणि वळणावळणाच्या मार्गामुळे वाहनांचा वेग कमी होतो आणि अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. प्रस्तावित भुयारी मार्गामुळे कोल्हापूर–रत्नागिरी प्रवासाचा कालावधी कमी होण्यासह प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई–गोवा महामार्गावरील टोलबाबतही चर्चा
बैठकीत मुंबई–गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्वसामान्य वाहनचालकांना दिलासा मिळावा यासाठी या महामार्गावरील टोलदर कमी करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
कोकणातील रस्ते विकासाला गती
यावेळी कोकणातील विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांवरही चर्चा झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी–जयगड, जयगड–गुहागर आणि चिपळूण–सातारा मार्गांच्या विकासासाठी नवीन आराखडे (डिझाईन्स) तयार करण्यात येणार आहेत.
याशिवाय लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली आणि मंडणगड मतदारसंघांतील विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण अधिक गतिमान होऊन व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




