श्रीवर्धन तालुका | प्रतिनिधी :
श्रीवर्धन तालुक्यातील वालवटी गावात वीजपुरवठा खंडित होताच मोबाईल नेटवर्कही पूर्णपणे बंद पडत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, ऑनलाइन काम करणारे नागरिक, विद्यार्थी तसेच आपत्कालीन संपर्कासाठी मोबाईलवर अवलंबून असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
याबाबत टॉवरचे सुपरवायझर प्रवीण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ऑटोमेशन प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे वीज गेल्यानंतर टॉवरची सेवा बंद होते. सध्या टॉवरवर केवळ सुमारे अर्धा तासाचा बॅटरी बॅकअप उपलब्ध असून त्यानंतर नेटवर्क पूर्णपणे खंडित होते. तसेच टॉवरचा जनरेटरही नादुरुस्त असून नवीन जनरेटर बसविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
देखभालीसाठी नियुक्त कर्मचारी म्हसळा येथे वास्तव्यास असून वालवटीपासून ते सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरावर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे वालवटी किंवा जवळच्या परिसरातील कर्मचारी नियुक्त केल्यास अशा समस्या अधिक वेगाने सोडवता येतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संपूर्ण गावाचे मोबाईल नेटवर्क बंद पडत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित टॉवर कंपनीने कायमस्वरूपी बॅकअप व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, नवीन जनरेटर तातडीने बसवावा आणि स्थानिक पातळीवर देखभाल यंत्रणा उभी करून नागरिकांची समस्या त्वरित सोडवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



