कन्नड | प्रतिनिधी
कन्नड तालुक्यातील आडगाव (पिशोर) येथील ग्राम विकास अधिकारी पोपटराव जंजाळ यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थांच्या वतीने अमोल भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसेवकावर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत कन्नड न्यायालयामार्फत वसूल करण्यात आलेली रक्कम बँकेत जमा न करता अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
याशिवाय ग्रामसेवक सतत गैरहजर राहणे, नियमित ग्रामसभा न घेणे, इतिवृत्त नोंदवही अद्ययावत न ठेवणे, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी अयोग्य वर्तन करणे, नमुना क्रमांक ८ मध्ये खाडाखोड करणे तसेच विविध कामांसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी केल्याचेही आरोप निवेदनात करण्यात आले आहेत.
ग्रामस्थांनी यापूर्वी पंचायत समिती, कन्नड येथेही तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत ग्रामनिधी व पाणीनिधीची रक्कम बँकेत जमा न केल्याचे आढळून आल्याचे सांगितले जात आहे. चौकशी अहवालात संबंधित अधिकारी दोषी असल्याचे नमूद करण्यात आले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
प्रशासनाने तातडीने ग्रामसेवकाचे निलंबन करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
