पालघर | प्रतिनिधी
केळवा रोड परिसरात ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत आगरी सेनेने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यावैभव शाळा, रावळे येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या सुमारे ६०० नागरिकांसाठी दुपारचे व रात्रीचे मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात आले.
पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळावी यासाठी आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने नियोजन करून अन्नाची व्यवस्था केली. तसेच ७ जुलै रोजीही दिवसभराच्या भोजनासाठी आवश्यक साहित्याचा साठा उपलब्ध करून देण्यात आला.
यावेळी शिंदे गट, गुजराती सेवा दल पालघर, प्रांताधिकारी मदनूरकर, तहसीलदार रमेश शेगडे आणि उपसरपंच अतुल हाडलं यांच्या सहकार्याने पूरग्रस्तांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
या मदतकार्यामध्ये प्रतीक भोईर, जयकांत घरत, कुमार महाले, प्राण भोईर, उदय भोईर, मनीष पाटील, हर्ष किणी, हर्षद घरत, विश्वनाथ किणी, सतीश घरत, सुरज किणी, राकेश किणी, चेतन गावड, राजेश पाटील आणि साईप्रसाद घरत यांनी विशेष योगदान दिले.
पूरपरिस्थिती पूर्णपणे निवळेपर्यंत मदतकार्य सुरू ठेवण्याचा निर्धार आगरी सेनेने व्यक्त केला असून, संकटाच्या काळात समाजसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
