पालघर | प्रतिनिधी
पश्चिम रेल्वेवरील वैतरणा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असलेला एकमेव भुयारी मार्ग (सबवे) गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडत असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सबवेमध्ये गुडघाभर पाणी साचले असून, प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर जाण्यासाठी प्रवाशांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने वृद्ध, महिला, विद्यार्थी आणि लहान मुलांचे विशेष हाल होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भुयारी मार्गातील पाणी उपसण्यासाठी अद्याप कोणतीही प्रभावी यंत्रणा तैनात करण्यात आलेली नसून, रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने तातडीने भुयारी मार्गातील पाणी उपसून मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच, या परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
