अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) तर्फे ‘फसल विमा महिना’ साजरा करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ अहिल्यानगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी तंत्र अधिकारी दत्तात्रय जाधव आणि कृषी सहाय्यक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार–२०२६) मध्ये सहभागी होण्यासाठी १४ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कृषी विभाग तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश सानप यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या योजनेअंतर्गत डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, लिंबू, पेरू, चिकू आदी फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच हळद या पिकाचाही योजनेत समावेश करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे.
‘फसल विमा महिना’ निमित्त भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी गावोगावी भेटी देत ‘फसल विमा पाठशाळा’ आयोजित करत आहेत. या माध्यमातून योजनेची पात्रता, नोंदणी प्रक्रिया, विमा संरक्षणाचे फायदे आणि नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.
हवामानातील सततच्या बदलामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वाढत असल्याने विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आर्थिक सुरक्षा कवच ठरत असल्याचे गणेश सानप यांनी सांगितले.
त्यांनी शेतकऱ्यांना शेवटच्या दिवसाची वाट न पाहता १४ जुलैपूर्वीच अर्ज करून फळपीक विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
