गेवराई | प्रतिनिधी
गेवराई शहरातील झपाट्याने विकसित होत असलेल्या तय्यब नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी नगरसेवक सय्यद एजाज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या परिसरासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) विनंती बस थांबा मंजूर झाला आहे.
बुधवारी (दि. ८ जुलै) या नव्या बसथांब्याच्या नामफलकाचे उद्घाटन तालुक्याचे लोकनेते बाळराजे पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यापूर्वी या परिसरातील नागरिकांना एसटी बस पकडण्यासाठी मोंढा नाका येथे जावे लागत असल्याने वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या या अडचणीची दखल घेत माजी नगरसेवक सय्यद एजाज यांनी एसटी डेपो व्यवस्थापक तसेच बीड येथील नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून हा बसथांबा मंजूर करून घेतला.
उद्घाटनप्रसंगी बाळराजे पवार यांनी बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी बसथांब्याजवळ लहान स्वरूपाचे प्रवासी निवारा शेड उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार, अय्युब बागवान, भाजप नेते बाळासाहेब सानप, नगरसेवक अकीफ काझी, बाबूभाई, माजिद मोईन तसेच परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तय्यब नगर व शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांनी बीड–जालना महामार्गावर एसटी बसथांबा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला अखेर यश मिळाल्याने आता विविध मार्गांवरील एसटी बसेस या ठिकाणी थांबणार असून प्रवाशांना चढ-उताराची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी नगरसेवक सय्यद एजाज तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
