
पातूर | प्रतिनिधी :
पातूर तालुक्यातील सावरगाव व परिसरातील शेतकऱ्यांवर सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. ‘INV-108 (Ennoveg-108)’, ‘Eagle-335’ तसेच इतर काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण अत्यंत कमी झाल्याचे, तर अनेक शेतांमध्ये बियाणे अजिबात उगवले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
चालू खरीप हंगामासाठी सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी विविध कृषी केंद्रांतून मोठ्या अपेक्षेने सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. मात्र, पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने बियाणे, मशागत, मजुरी, खते आणि औषधांवरील खर्च वाया गेला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
या घटनेमुळे संबंधित बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (अकोला) तसेच तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात बाधित शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, चौकशीत दोषी आढळणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक आणि विक्रेत्यांवर ‘द सीड्स ॲक्ट, १९६६’ तसेच ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
