जुन्नर | प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती जलमय झाली असून भाजीपाला व नगदी पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके सडू लागली असून कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आळेफाटा, वडगाव कांदळी, साळवाडी, संतवाडी, आनंदवाडी, राजुरी आणि बोरी बुद्रूक परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून फ्लॉवर, कोबी, कोथिंबीर, मेथी, भेंडी, काकडी, मिरची, वांगी, टोमॅटो यांसारख्या भाजीपाला पिकांसह झेंडू आणि जनावरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पिकांसाठी लाखो रुपये खर्च करून मेहनतीने केलेली लागवड डोळ्यांसमोर पाण्यात सडत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन हातातून गेल्याने केलेला भांडवली खर्चही वसूल होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त मागणी आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
