
तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. संबंधित बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तालुक्यातील दहिगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र, निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे अनेक शेतांमध्ये सोयाबीनचे उगवणच झाली नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धवसेनेचे कार्यकर्ते किरण अवताडे यांनी केली.
गुरुवार (दि. ९ जुलै) रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान यंदा मान्सून उशिरा सक्रिय झाल्याने पेरणी जवळपास महिनाभर उशिराने झाली. त्यातच पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
कृषी विभागाकडे तेल्हारा तालुक्यातून आतापर्यंत सुमारे ६५ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये दहिगाव परिसरातील तक्रारींची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली. पावसाअभावी आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे खरेदी केले होते. मात्र, बियाण्यांची उगवण न झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
संबंधित बियाणे उत्पादक कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी किरण पाटील अवताडे तसेच शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
