
गंगापूर | प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांचा भक्तीमय प्रवास उत्साहात सुरू असून, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
गंगापूर परिसरातून मार्गक्रमण करणाऱ्या दिंडीत सहभागी वारकरी “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल” या नामघोषात भगव्या पताका फडकवत पायी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पावसाळी वातावरण असूनही वारकऱ्यांच्या उत्साहात कोणतीही कमतरता जाणवत नसून विठुरायाच्या दर्शनाची आस त्यांच्या प्रत्येक पावलातून दिसून येत आहे.
दिंडी गंगापूर परिसरातून जात असताना नागरिकांनी विविध ठिकाणी वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेकांनी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत वारकऱ्यांची सेवा केली.
विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ, अखंड नामस्मरण आणि भक्तिभावाने भरलेला हा प्रवास गंगापूर परिसरात अध्यात्मिक आणि आनंदमय वातावरण निर्माण करत असून, वारकरी परंपरेतील श्रद्धा, समता आणि सेवाभावाचे दर्शन घडवत आहे.
