
वर्धा | प्रतिनिधी
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांबाबत विद्यार्थी प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तातडीने हस्तक्षेप करून विद्यापीठ प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात सन २०२२ पासून बंद असलेली पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करणे, स्त्री अध्ययन विभाग व चित्रपट अध्ययन विभाग पुन्हा मुख्य परिसरात कार्यान्वित करणे तसेच बंद करण्यात आलेले डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पुन्हा सुरू करावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी यापूर्वीही अनेक वेळा विद्यापीठ प्रशासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही ठोस निर्णय न झाल्याने गांधीवादी विचारसरणीवर आधारित बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करून प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विद्यापीठ प्रशासनाशी समन्वय साधावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. या मागणीची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी खताळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमराज खंडवे, जिल्हा सचिव क्रिश बेरागडे, युनिट अध्यक्ष प्रज्ञा बेरागडे, गौरव पहाडे, कार्तिक इंगळे, रलेश पाल, अजय केवलत, ओम भोंगे, शुभम साळुंखे, कुमार कार्तिक, चेतन राऊत यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच NSUI जिल्हाध्यक्ष विश्वभूषण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
