मुंबई (कांदिवली पश्चिम) | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून १ ऑगस्ट २०२६ पासून एनसीएमसी (NCMC) कार्डची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मात्र, कार्ड काढताना प्रवाशांना येणाऱ्या विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणी लक्षात घेता या निर्णयास आणखी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केली आहे.
भारत कवितके यांनी सांगितले की, एनसीएमसी कार्ड नोंदणी प्रक्रियेदरम्यान सर्व्हर डाऊन होणे, मोबाईलवर ओटीपी वेळेत न मिळणे, बायोमेट्रिक पडताळणीमध्ये अडचणी येणे, तसेच मिळणाऱ्या पावतीवरील मजकूर अस्पष्ट असल्याने कार्ड मिळवताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय अनेक बसस्थानकांवर पुरेशी शेड, बसण्याची व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा नसल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात व पावसात तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मोबाईल नसलेले किंवा डिजिटल प्रक्रियेची माहिती नसलेले नागरिक विशेषतः ज्येष्ठ महिला आणि अशिक्षित प्रवासी या प्रक्रियेमुळे अधिक त्रस्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या संदर्भात रांगेत उभ्या असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांशी संवाद साधला असता, त्यांनी आधार कार्ड हे शासनमान्य ओळखपत्र असताना अतिरिक्त प्रक्रियेमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच बसस्थानकांवरील शेड, पंखे, स्वच्छतागृहे, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
एनसीएमसी कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करून कार्ड पोस्टाद्वारे घरपोच उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी तसेच १ ऑगस्टची अंतिम मुदत वाढवून नागरिकांना पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी भारत कवितके यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे.
