
सांगली | प्रतिनिधी :
सांगली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने पूरस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने घटू लागली असून जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी सुमारे १२ फूट इतकी नोंदविण्यात आली. अवघ्या २४ तासांत नदीची पातळी तब्बल १८ फूटांनी घटल्याने पूराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
दरम्यान, वारणा धरणात २०.१८ टीएमसी तर कोयना धरणात ५२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या बुधवारी जिल्हा आणि धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने नदीपात्रातील पाणी वेगाने ओसरू लागले आहे.
धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गात वाढ करण्याची आवश्यकता भासलेली नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही काहीसा दिलासा मिळाला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
जिल्ह्यातील मिरज, जत, खानापूर, वाळवा, तासगाव, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस आणि कडेगाव या तालुक्यांमध्ये दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन सुरळीत होत असून नागरिकांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे. प्रशासन मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
