मुळशी | प्रतिनिधी
मुळशी तालुक्यातील पिरंगुट व परिसरात अतिवृष्टीमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योग, लघुउद्योग, हॉटेल व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुळशीचे तहसीलदार विनयकुमार चोबे यांना निवेदन देऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली.
निवेदनामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटर सुरळीत चालविण्यासाठी आवश्यक डिझेलचा अखंड पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच परिसरातील पेट्रोल पंपांना त्याबाबत आवश्यक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत उद्योग, व्यावसायिक आणि नागरिकांना तातडीने आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी प्रशासनाने समन्वय साधून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
उद्योग-व्यवसाय सुरळीत सुरू राहावेत आणि नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.




