प्रतिनिधी :
कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील शिरढोण–कुरुंदवाड दरम्यानच्या पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुलाला जलपर्णीचा मोठ्या प्रमाणात विळखा कायम असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे शिरढोण–कुरुंदवाड हा प्रमुख मार्ग सलग तीन दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. गेल्या दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर कमी झाल्याने नदीची पाणीपातळी घटली आणि आज हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
आज सकाळी पुलावरील पाणी पूर्णपणे ओसरले असले, तरी पुलावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकून राहिल्याने रस्त्यावर तिचा जाड थर साचला होता. त्यामुळे वाहतूक सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने पुलावरील जलपर्णी हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
दरम्यान, पुराच्या पाण्यासोबत आलेली जलपर्णी पुलालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात साचली आहे. पाणी ओसरल्यानंतरही ही जलपर्णी शेतातच अडकल्याने पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने वेळेत जलपर्णी हटवली असती तर हे नुकसान टाळता आले असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. तसेच पुलाला अजूनही जलपर्णीचा विळखा कायम असून पुरामुळे पुलावरील लोखंडी बॅरिकेडचेही नुकसान झाले आहे. पुलावरील उर्वरित जलपर्णी हटवून पूल पूर्णपणे सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
