
पंढरपूर | प्रतिनिधी :
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत, म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यातून सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील कॅनॉलच्या लाभक्षेत्रातही सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार असून शेतीपंपांसाठी आठ तास वीजपुरवठा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कृष्णा व पंचगंगा नद्यांतील पुराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळ योजनेच्या वितरिका क्रमांक १, २ तसेच उमदी वितरिकेत सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित विभागाने कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात केली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मासाळ यांनी दिली.
सध्या कृष्णा व पंचगंगा नदी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असताना सोलापूर जिल्ह्यात, विशेषतः मंगळवेढा व पंढरपूर परिसरात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पेरणी रखडली असून शेतकरी पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पाणी कालव्यांद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
याशिवाय, वीर धरणातील पाणीसाठा वाढल्याने निरा भाटघर उजवा कालवा (NRBC) प्रणालीद्वारे पंढरपूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना सिंचनासाठी पाणी सोडण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत शेतीपंपांसाठी सध्या मिळणारा दोन तासांचा वीजपुरवठा वाढवून आठ तास करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत हा निर्णय अमलात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयांमुळे मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून खरीप हंगामाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
