प्रतिनिधी
पेरणीनंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. पिकांची उगवण झाली असली तरी पुरेशा पावसाअभावी वाढ खुंटली असून, दिवसभर कडक उन्हामुळे पिके करपू लागल्याची परिस्थिती अनेक भागांत निर्माण झाली आहे.
पेरणीयोग्य पाऊस पुरेसा नसतानाही शेतकऱ्यांनी धाडस करत खरीप पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
११ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ६ लाख २८ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी केवळ २ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली होती. म्हणजेच निम्म्याहून कमी क्षेत्रावर पेरणी झाली असून, उर्वरित क्षेत्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून उगवलेली पिके धोक्यात आली आहेत. वेळेत चांगला पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट आणि मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
सध्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, लवकरात लवकर मान्सून सक्रिय होऊन समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

