
प्रतिनिधी
“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया…” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी अनेकांनी ऐकल्या असतील; मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून मानवतेची, समतेची आणि सेवाभावाची शाळा असल्याची भावना आर.एस.पी. रस्ता वाहतूक सुरक्षा अधिकारी तथा कला शिक्षक यश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
पुणे ते सोलापूर मार्गावर पंढरपूर वारीदरम्यान आर.एस.पी. रस्ता वाहतूक सुरक्षा अधिकारी म्हणून काम करताना तसेच ठाणे जिल्हा शिक्षण कार्यालयाच्या आदेशानुसार उल्लास नवभारत साक्षरता अभियान, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या साक्षरता वारी व वाहतूक सुरक्षा अभियानात सहभागी होताना त्यांना वारीचे अनोखे दर्शन घडले.
यश महाजन यांनी आपल्या अनुभवात म्हटले आहे की, वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नसून श्रद्धा, समता, सेवा आणि प्रेमाचा अखंड उत्सव आहे. लाखो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठल नामाचा गजर करत पुढे जात असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचे तेज आणि विठ्ठल भेटीची आस स्पष्ट दिसत होती.
वारीतील अन्नदान परंपरेने त्यांना विशेष भावूक केले. विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रेमाने वाढले जाणारे बाजरीची भाकरी, बेसन, ठेचा, डाळ-भात, मसालेभात, उसाचा रस, बिस्किटे, फळे, पोहे तसेच इतर खाद्यपदार्थ यामध्ये केवळ चव नव्हती, तर मायेचा स्पर्श होता, असे त्यांनी नमूद केले.
तसेच एवढ्या मोठ्या जनसमुदायाचे व्यवस्थापन करताना पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने दाखवलेला संयम, नियोजन आणि सेवाभावही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
वारीत प्रत्येक जण एकमेकांना “माऊली” म्हणून संबोधतो, येथे श्रीमंत-गरीब, मोठा-लहान असा कोणताही भेद नसतो. परस्परांप्रती असलेला आदर, प्रेम, मदतीची भावना आणि बंधुभाव हीच वारीची खरी ओळख असल्याचे त्यांनी आपल्या अनुभवातून मांडले.
शाळेत दररोज म्हणण्यात येणाऱ्या “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” या प्रतिज्ञेचा खरा अर्थ पंढरपूर वारीत अनुभवायला मिळाला. वारीतील प्रेम, समता, सेवा आणि माणुसकीचा संदेश समाजाने दैनंदिन जीवनात स्वीकारला, तर अधिक सुसंस्कृत आणि बंधुभाव जपणारा भारत घडू शकतो, असा विश्वास यश महाजन यांनी व्यक्त केला.
त्यांच्या मते, पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून मानवतेचे धडे देणारे, संस्कार घडवणारे आणि भारतीय संस्कृतीचे जिवंत विद्यापीठ आहे.

