पांढरकवडा | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्हा किसान सभा जिल्हा कमिटीच्या वतीने पांढरकवडा येथील उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शासनाने काढलेल्या शासन निर्णयाचा (जीआर) निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत जीआरची होळी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी विविध जाचक अटी लावून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप किसान सभेने केला.
तसेच, कर्जमाफीच्या अटींचा अभ्यास करण्यासाठी समित्या नेमून निर्णयाला वारंवार विलंब केला जात असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याची टीकाही आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम, जिल्हा कमिटी सदस्य प्रकाश संकलवार, तालुकाध्यक्ष दिलीप कुमरे, अर्जुन आत्राम, अंकुश बिरकुलवार, महेंद्र मन्ने, श्रवण घोडाम, किसन पवार, पांडुरंग शिंदे, संभा पेंदोर, मीराबाई शिंदे, अतुल, गणेश, किशोर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
- किसान सभेचे पांढरकवडा येथे आंदोलन.
- फसव्या कर्जमाफीचा आरोप करत जीआरची होळी.
- शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी.
- मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर.
- विविध पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी.




