
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
नशामुक्त छत्रपती संभाजीनगर अभियान व बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगर पंधरवड्याचा शुभारंभ सोमवार (दि. १३ जुलै) रोजी एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गालांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गोडा (भा.प्र.से.) उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त प्रविण पवार, आयुक्त अमोल येडगे, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा (भा.प्र.से.), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोकर, शिक्षणाधिकारी अधिनी लाठकर तसेच अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी वाढत्या व्यसनाधीनतेमुळे युवकांचे होणारे नुकसान, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि बालविवाहामुळे मुलांच्या शिक्षण व भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. व्यसनमुक्त समाज आणि बालविवाहमुक्त जिल्हा घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
१३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये जनजागृतीपर व्याख्याने, शपथविधी, रॅली, प्रबोधनपर कार्यक्रम तसेच विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
“नशामुक्त आणि बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर” घडविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. या अभियानामुळे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता वाढून बालविवाह निर्मूलनाच्या चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.




