
पाटणबोरी | प्रतिनिधी
पाटणबोरी परिसरात सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या संथ गतीमुळे नागरिकांना गेल्या दीड महिन्यांपासून मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण रस्ता, खोदकाम, चिखल, साचलेले पाणी आणि पर्यायी बसथांब्याच्या अभावामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि रोजंदारीवर जाणाऱ्या कामगारांचे हाल होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सध्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यावर मोठे खड्डे, चिखल आणि पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता बांधकाम सुरू झाल्यापासून एसटी बसचा नियमित थांबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना सुमारे एक किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन बस पकडावी लागत आहे. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांना बसत आहे.
पावसाळ्यात बसची प्रतीक्षा करताना प्रवाशांसाठी कोणतेही शेड किंवा निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना पाऊस आणि उन्हात उघड्यावर उभे राहावे लागत आहे. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेकांना वेळेत बस मिळत नसल्याने खासगी वाहनांचा वापर करावा लागत असून अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी रस्ता बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
- रस्ता बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
- एसटी प्रवाशांसाठी तात्पुरता सुरक्षित बसथांबा आणि शेडची व्यवस्था करावी.
- पावसाचे पाणी साचणारे खड्डे त्वरित बुजवावेत.
- कामाच्या गुणवत्तेची आणि विलंबाची चौकशी करावी.
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काम पूर्ण करण्याचा निश्चित कालावधी जाहीर करून त्यानुसार काम पूर्ण करावे.
दरम्यान, या सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
