
जत | प्रतिनिधी
मान्सूनच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या मोठ्या उत्साहात पूर्ण केल्या. ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांची पेरणी झाल्यानंतर मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पेरणीनंतर काही ठिकाणी पिकांची उगवण झाली असली, तरी पुरेशा पावसाअभावी कोवळी रोपे करपू लागली आहेत. शेतातील माती कोरडी पडून जमिनीला भेगा पडू लागल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतीचा उत्पादन खर्च आधीच वाढला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा पेरणी करावी लागल्यास आर्थिक भार अधिक वाढणार असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक शेतकरी कर्ज काढून शेती करत असल्याने पावसाअभावी त्यांची आर्थिक अडचण अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे.
सध्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून समाधानकारक पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. अन्यथा पावसाचा खंड कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
