सांगली | प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज
आषाढी वारीदरम्यान सोमवारी (१३ जुलै) सकाळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळील बेलसर फाटा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीला ट्रकची धडक बसून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा मार्गस्थ असताना नांदेडच्या दिंडीचा ट्रक सांगली जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जेजुरी येथील आनंदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत वारकरी
- नंदा बाबुराव पवार (वय ६०), रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली
- माधवी राजाराम सलगरे (वय ५५), रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली
- राजश्री शंकर भोसले (वय ५५), रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली
जखमी वारकरी
- शांता शिवाप्पा अलकोपर (वय ७०), रा. मिरजवाडी, ता. मिरज
- कासाबाई जगन्नाथ गस्ते (वय ७०), रा. आष्टा, ता. वाळवा
- लक्ष्मी विठ्ठल गडदे (वय ४५), रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ
- अक्काताई बबन कोळी (वय ६०), रा. शिरगाव, ता. तासगाव
- शैलजा दिनकर जगताप (वय ५८), रा. कवलापूर, ता. मिरज
- गीताबाई सदाशिव हंकारे (वय ६५), रा. कसबे डिग्रज, ता. मिरज
- मंगल विलास पाटील (वय ६५), रा. कवलापूर, ता. मिरज
या दुर्घटनेनंतर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वारकऱ्यांच्या दिंड्या आणि वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था असती, तर अशी दुर्घटना टाळता आली असती, असे त्यांनी सांगितले. पुढील काळात पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करण्याची मागणीही त्यांनी केली.
‘विठ्ठल रखुमाई’ योजनेची माहिती
राज्य शासनाच्या ‘विठ्ठल रखुमाई’ योजनेनुसार वारीच्या कालावधीत अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना पायी किंवा वाहनाने पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना लागू असून, लाभासाठी पंढरपूर यात्रेबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
