मारेगाव | प्रतिनिधी :
मारेगाव तालुक्यातील चोपण व चनोडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना वाहतुकीच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजूभाऊ उंबरकर यांनी स्वखर्चातून बससेवा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मानव विकास योजनेअंतर्गत सुरू असलेली बससेवा प्रामुख्याने मुलींसाठी उपलब्ध असून मुलांच्या प्रवासासाठी कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण होत होत्या. ही समस्या ग्रामस्थांनी राजूभाऊ उंबरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.
याची तातडीने दखल घेत राजूभाऊ उंबरकर यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने स्वखर्चातून बस, चालक आणि डिझेलची व्यवस्था करून बससेवा सुरू केली. या उपक्रमामुळे दोन्ही गावांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी राजूभाऊ उंबरकर यांचे आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासनानेही आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अनंता अंतरकर (ग्रामीण कार्यकर्ता) यांचीही उपस्थिती होती.




