शहापूर | प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेले ॲड. बबन हरणे यांना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2024’ जाहीर झाला आहे. ठाणे विभागातून त्यांना द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे.
वन विभागाकडून दरवर्षी वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन, जलसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि शाळांचा गौरव केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत बबन हरणे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्कारामध्ये ₹30 हजारांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि वनमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
बबन हरणे यांच्या पुढाकारातून हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली असून पर्यावरण संरक्षणासाठी अनेक युवकांना प्रेरित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यामुळे शहापूर तालुक्यासह संपूर्ण ठाणे विभागाचा गौरव वाढला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. “निसर्ग टिकला तरच आपण टिकू” हा संदेश त्यांच्या कार्यातून प्रभावीपणे अधोरेखित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.




