
अवैध दारूविरोधात ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाची घोषणा
पातूर | प्रतिनिधी :
नवेगाव–उंबरवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध गावठी दारू विक्रीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एल्गार पुकारला आहे. अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दारूमुळे वाढते अपघात आणि सामाजिक समस्या
गेल्या काही दिवसांपासून नवेगाव, उंबरवाडी आणि परिसरातील गावांमध्ये अवैध दारूची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
दुर्दैवी अपघातानंतर संताप
दि. २९ जून २०२६ रोजी सावरगाव–झरंडी मार्गावर दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात आकाश शेषराव शिंदे आणि अजय चोंढकर या दोन युवकांचा मृत्यू झाला, तर तिसरा युवक नागपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अवैध दारूविरोधात कठोर कारवाईची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.
प्रशासनाला निवेदन
या पार्श्वभूमीवर निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी अकोला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच चान्नी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. परिसरातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही गंभीर परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चा
क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी आलेगाव, कार्ला, गोळेगाव, पाडशिंगी, सावरगाव, झरंडी, नवेगाव, उंबरवाडी, अंधारसांगवी, पांढुर्णा, सोनुना, पिंपळडोळी आणि परिसरातील महिला-पुरुषांच्या सहभागातून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती
या आंदोलनात दुर्गाबाई डिंगबर ठाकरे, लताबाई सीताराम डुकरे, शीतल प्रकाश धंदरे, रूपाली अमोल वाथे, शोभा बंडू डाखोरे, शालिनी बबन वाथे, कमलाबाई प्रकाश ताजने, लक्ष्मीबाई विष्णू तिवाले, पारूबाई विजय गायकवाड, कमलाबाई रमेश धंदरे, रुक्मा किशन शिंदे, समाधान झांगुजी शिंदे, समाधान गाढवे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.






