ब्रह्मपुरी | | दि. १३ जुलै २०२६
विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची जोरदार मागणी करत विधानसभेत बुलंद आवाज उठविला. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करत ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
‘ब्रह्मपुरी जिल्हा ही काळाची गरज’
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे यांनी ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीची गरज अधोरेखित केली. ब्रह्मपुरीसह नागभीड, सिंदेवाही, सावली आणि परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय सोयी व विकासासाठी स्वतंत्र जिल्हा होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडलेल्या ठाम भूमिकेचे कौतुक करत संघर्ष समितीतर्फे शहरात ठिकठिकाणी अभिनंदनाचे फलक लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘ब्रह्मपुरी जिल्हा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही’ – विजय वडेट्टीवार
सत्काराला उत्तर देताना आमदार विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले, “ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा प्रश्न मी विधानसभेत अत्यंत ठामपणे मांडला आहे. जोपर्यंत ब्रह्मपुरीला जिल्ह्याचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार आहे. ब्रह्मपुरी जिल्हा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.”
आवश्यक असल्यास नवीन तहसीलांची निर्मिती करूनही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ब्रह्मपुरी परिसराचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्यास निमंत्रक प्राचार्य सुयोग बाळबुद्धे, प्रशांत डांगे, नगराध्यक्ष योगेश मिसार, उपाध्यक्ष डॉ. नितीन उराडे, नगरसेवक प्रकाश खोब्रागडे, पुष्पांकर बांगरे, डॉ. बाळकृष्ण शेळके, लीलाधर झलके, शंकरराव उराडे, प्राचार्य डॉ. नामदेवराव कोकोडे, दत्तू टिकले, केशवराव करंबे, प्राचार्य डॉ. संजय हर्षे, खेमराज तिडके, गाजी पटेल यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.
आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी विधानसभेत घेतलेल्या भूमिकेमुळे ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीच्या मागणीला नव्याने बळ मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.





