औसा प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज
शासनाच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असताना, औसा तालुक्यातील कुमठा येथे उभारण्यात आलेले अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र गेल्या दीड वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जलकुंभाशेजारी लाखो रुपयांचा खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही अद्याप त्याचे उद्घाटन झाले नसल्याने केंद्र कार्यान्वित होऊ शकलेले नाही. परिणामी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असूनही ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
गावातील अनेक नागरिकांना आजही शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. पाणी उपलब्ध असतानाही केवळ उद्घाटन न झाल्यामुळे केंद्र बंद ठेवण्यात आल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदावर पूर्ण झाला असला, तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचलेला नसल्याची टीका होत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दीड वर्षांपासून वापराविना बंद असलेल्या या केंद्रातील यंत्रसामुग्रीची देखभाल, कार्यक्षमता आणि भविष्यातील वापराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा उपयोग न झाल्याने शासनाच्या पैशाचा अपव्यय होत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.
ग्रामस्थांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जल जीवन मिशनचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा आहे. मात्र, कुमठा येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारूनही ते दीड वर्षांपासून सुरू न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.”
कुमठा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन तातडीने करून ते कार्यान्वित करावे आणि ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलतात का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
