
नायगाव प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज
मौजे बेंद्री येथील ग्रामस्थांनी वारंवार होणाऱ्या वीज कपात व रात्रीच्या लोडशेडिंगच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. अनेक दिवसांपासून गावात नियमित वीजपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, तातडीने २४ तास अखंड वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी ग्रामस्थांनी महावितरणचे अधिकारी पाटील साहेब व तेलंग साहेब यांची भेट घेऊन बेंद्री गावातील रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करून अखंड वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.
गावात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोबाईल चार्ज करण्यासाठी शेजारच्या गावात जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होत असून, शेतकरी, व्यापारी आणि लघु व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. उकाड्याच्या वातावरणात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत असून, रात्री वीज नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे नागरिकांचा संयम संपत आला असून, प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत महावितरणचे अधिकारी पाटील साहेब व तेलंग साहेब यांनी बेंद्री गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच पुढील आठ दिवसांत २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी राम पाटील चिखलिकर, ज्ञानेश्वर पाटील बेंद्रिकर, अरुण पाटील हासनाबादे, निळकंठ साहेब (आर्मी), सुनील पाटील बेंद्रिकर, अजित पाटील बेंद्रिकर, माधव पाटील, दत्ता मंगरुळे बेंद्रिकर, जनार्धन टोंपे, बसवेश्वर पाटील बेंद्रिकर, पोलीस पाटील गोविंद बेंद्रिकर, बालाजी माचापूरे, सचिन पाटील कदम, परमेश्वर पाटील कदम, कपिल हासनाबादे यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास बेंद्री ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला.
