अमरावती प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज
अमरावती लोकसभा मतदारसंघातील अचलपूर तालुक्यातील रावळगाव परिसरात बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने दखल घेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांसोबत करण्यात आलेल्या पाहणीत अनेक शेतांमध्ये बियाण्यांची अत्यल्प उगवण झाल्याचे, तर काही ठिकाणी बियाणे पूर्णपणे न उगवल्याचे निदर्शनास आले.
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी निकृष्ट व बोगस बियाणांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची व्यथा खासदार वानखडे यांच्यासमोर मांडली. अनेक शेतांमध्ये केवळ १० ते २० टक्केच उगवण झाल्याचे, तर काही ठिकाणी बियाणे अजिबात उगवले नसल्याचे त्यांनी सांगितले. उगवलेल्या पिकाचाही दर्जा समाधानकारक नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांनी बूस्टर, ओसवाल तसेच इतर काही कंपन्यांच्या बियाणांबाबत गंभीर आक्षेप नोंदवले. निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
या गंभीर प्रकाराची दखल घेत खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संबंधित बियाणा कंपन्या आणि विक्रेत्यांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. दोषी आढळणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर, माजी पंचायत समिती उपसभापती श्रीधरभाऊ काळे, चेतन जवंजाळ, सुनील पवार, स्वप्निल राऊत, सुभाष खांडेकर, गोलू अतकरे, राजेंद्र राऊत, प्रकाश राऊत, हर्षल जवंजाळ, प्रशांत भडांगे, जुबेर भाई यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
□ बॉक्स : खासदारांच्या प्रमुख सूचना
- बोगस व निकृष्ट बियाण्यांची तातडीने चौकशी करावी.
- संबंधित कंपन्या व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत.
- बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.
- दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
