
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी; प्रशासनाकडून वरिष्ठांशी चर्चा करून निर्णयाचे आश्वासन
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | गेवराई | प्रतिनिधी
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंदफणा व गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या, उभी पिके वाहून गेली असून त्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भाजप नेते बाळराजे पवार यांनी दिला.
गेवराई तालुक्यातील सिंदफणा व गोदावरी नदीकाठच्या शेतजमिनी सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या होत्या. या नैसर्गिक आपत्तीत उभी पिके तसेच मोसंबी, आंबा व सीताफळाच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कृषी विभाग, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामेही केले होते.
हिरापूर, टाकळगाव, कानडा पिंपळगाव आणि एरंडगाव या चार गावांतील सुमारे २५० एकर शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद असतानाही शासनाच्या मदत यादीत केवळ १० ते १२ शेतकऱ्यांचीच नावे समाविष्ट झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच या शेतकऱ्यांनाही केवळ पाच हजार रुपयांची मदत मंजूर झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३) भाजप नेते बाळराजे पवार यांनी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी शुभम पवार व तहसीलदार संजय सोनवणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करत प्रशासनासमोर त्यांची बाजू ठामपणे मांडली.
यावर उपविभागीय अधिकारी शुभम पवार व तहसीलदार संजय सोनवणे यांनी या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील योग्य निर्णय घेतला जाईल व शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले.
यावेळी नगरपरिषदेचे माजी सभापती भरत गायकवाड, प्रा. येळापुरे, अशोक चव्हाण, सरपंच घाटूळ काका, सचिन गव्हाणे, जगन्नाथ गव्हाणे, दिनेश निर्मळ, दत्ता ढोरमारे, राजू पटेल, इस्माईल पटेल, गजानन गव्हाणे, बाबू गव्हाणे, राहून धापसे, किशोर धापसे, रामप्रसाद गव्हाणे, महेश गव्हाणे, सुनील गिरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
