वारंवार होणाऱ्या मोठ्या आवाजांबाबत प्रशासनाकडून खुलाशाची मागणी
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | धाराशिव | प्रतिनिधी :
धाराशिव तालुक्यातील येडशी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार मोठ्या आवाजांचे (‘गुड’ आवाज) सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहा-बारा दिवसांच्या अंतराने हे आवाज ऐकू येत असून, त्याची तीव्रता वाढत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सकाळी १०.०५ व १०.३५ वाजता मोठे आवाज झाल्याने गाव हादरल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला. त्यानंतर १६ जुलै रोजी सकाळी ९.०७ वाजताही अशाच प्रकारचा आवाज ऐकू आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे आवाज नेमके कशामुळे होत आहेत, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. भूगर्भातील हालचाली, डोंगर परिसरातील खडी क्रशर, शेतातील विहिरींची खोदकामे, रस्त्यावरून जाणारी अवजड वाहने किंवा अन्य कोणते कारण यामागे असू शकते का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अशा प्रकारचे आवाज झाले होते. मात्र सध्या होणाऱ्या आवाजांची तीव्रता अधिक असल्याने घरांतील वस्तूंना हादरे बसत असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
या रहस्यमय आवाजांचे नेमके कारण शोधून नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी वरिष्ठ प्रशासनाने तातडीने चौकशी करून अधिकृत खुलासा करावा, अशी मागणी सामाजिक स्तरातून जोर धरत आहे.
