
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | पातूर | प्रतिनिधी :
सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, बंद झालेली आलेगाव–अकोला एस.टी. बस सेवा आजपासून पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात आली. आज सकाळी १०.३० वाजता आलेगाव बसस्थानकावरून बस अकोल्याकडे रवाना झाली.
ही बस सेवा बंद झाल्यामुळे आलेगाव व परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, शासकीय व खासगी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. सेवा पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
बस सेवा पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात आलेगाव बसस्थानकावर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एस.टी. बसचे फुलांनी स्वागत करण्यात आले तसेच घोषणाबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळाभाऊ सरोदे यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी बसचे चालक व वाहक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच आलेगाववासीयांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले.
या प्रसंगी नितीन ढोणे, रविंद्र द्याईत, सुनील महल्ले, सचिन गिऱ्हे, उमेश राऊत, पुरुषोत्तम आवटे, रवी तायडे, चोथवे काका, यनकर भाऊ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
